शिक्षा कशासाठी? - भाग १

ज्या क्रूर शिक्षा आपण 'मुलांच्या चांगल्यासाठी' म्हणून करतो, त्याने खरंच मुलांना फायदा होतो का, त्यांना शिस्त लागते का, या प्रश्नांचा गांभीर्याने विचार केला तर त्यांच उत्तर नकाराथीर्च मिळतं.



क्लिनिकमध्ये गेले आणि फोन खणखणला. फोनवर एका पालकाच्या काळजीयुक्त स्वरातून ते खूप बैचेन असल्याचं जाणवलं. तातडीने भेटण्यासाठी त्यांनी माझी वेळ मागितली. भेटीत कळलं की, त्यांची सहावीतली मुलगी शाळेत जाण्यासाठी नकार देतेय. शाळेचं नाव काढलं तरी ती खूप घाबरते. आईला तिच्या या अचानक झालेल्या वागण्यातील बदलाचा अंदाजच येत नव्हता. शेवटी, समुपदेशनातील अनेक तंत्र वापरून ती बोलती झाली. त्यानंतर लक्षात आलं की, त्यांच्या शिक्षिकेने, 'जर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर, गणवेश न घालता शाळेत फिरवीन', अशी धमकावणी केली होती. या नुसत्या धमकीने मुला-मुलींच्या मनात प्रचंड भीती बसली आणि केवळ कल्पनेनेच ती शाळेत जाण्यास तयार नव्हती.

या आणि अशाप्रकारच्या शिक्षा बऱ्याच प्रमाणात शाळांमध्ये किंवा अनेकदा घरीही पालकांकडून केल्या जातात. वर्गाच्या बाहेर काढणं, पट्टीने/पट्ट्याने/हाताने मारणं, बोटं उलटी मोडणं, अंगठे धरून उभं करणं, बाथरूम-संडासात कोंडून ठेवणं, खायला न देणं, शाळा सुटल्यावरही दोन-चार तास थांबवून ठेवणं, मुलांच्या गळ्यात 'मी वेडा आहे' किंवा 'मी मूर्ख आहे', अशा पाट्या लटकवून त्याला प्रत्येक वर्गात फिरवणं... हे काही शिक्षांचे प्रकार. पेमळ, मुलांसाठी जीव टाकणारे पालक अशावेळी अतिशय कठोर होताना दिसतात आणि मग अशा अघोरी पद्धतींचा वापर केला जातो. ज्या शिक्षेच्या पद्धतीमुळे मुलांचा 'शारीरिक आणि मानसिक छळ' होतो त्या शिक्षा 'बालशोषण' यात मोडू शकतात. अशा शिक्षा आणि बालशोषण याला वेगळं करणारी रेषा फार अस्पष्ट आहे. म्हणूनच या शिक्षा करताना आपण बालशोषणाचा (चाइल्ड अब्युझ) गुन्हा तर करत नाही ना, याचा विचार जरूर व्हावा. पण, बऱ्याचदा या गोष्टींचा विचारच केला जात नाही.

मुळात शिक्षा कशासाठी, हा प्रश्न आहे. मुलांना चांगलं/वाईट, चूक/बरोबर या गोष्टी समजाव्यात म्हणून बरेचदा शिस्त आणि शिक्षा हे समानाथीर् नसलेले शब्द आपण समानाथीर् असल्यासारखे वापरतो. म्हणजे आपलं मूल समाजाचा चांगला सदस्य बनावा किंवा त्याला चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी आपण शिक्षांचा उपयोग करतो. शिस्त लावण्याची प्रक्रिया अगदी लहानपणापासूनच सुरू होते. घरी आई-वडील, आजी-आजोबा आणि शाळेत शिक्षक, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मुलांना शिस्त लावत असतात. पण या विविध पद्धतींमुळे मुलं गोंधळून जातात. म्हणून अगदी लहानपणापासूनच 'शिस्त' याविषयी घरातील सर्वांची एकवाक्यता होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शिस्त ही फक्त मुलांना लावून चालत नाही तर, ती वातावरणातच असावी लागते. मुलं अनुकरणप्रिय असल्याने ते आई-वडिल, घरातील इतर मोठ्यांचे बघून शिकतात. उदा, आपण मुलांना खोटं बोलायचं नाही असं शिकवतो. पण, बाबांना एखादा फोन घ्यायचा नसेल तर, घरी असतानाही 'ते घरी नाहीत' असं सांगताना मुलांनी ऐकलेलं असतं आणि यामुळे लहान मुलं गोंधळून जातात. मोठे सांगतात ते बरोबर की, वागतात ते बरोबर असा प्रश्न त्यांना पडतो.



टीप: प्रस्तुत लेख महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात दि. २ सप्टेंबर, २००९ रोजी प्रसिद्ध झाला आहे. लेखिका आहेत - अर्चना धाक्रस (काउन्सिलर)

लेखाचा मूळ दुवा पाहण्यासाठी येथे टिचकी द्या.


0 Comments:

  © Blogger template ProBlogger Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP